शासकीय भिक्षेकरी गृहातील महिला व पुरुषांना स्वावलंबी करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम आखावेत – अदिती तटकरे
मुंबई, दि.१९ ऑगस्ट – भिक्षेकरी प्रवृत्तीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना केल्या जाव्यात, भिक्षेकरी गृहातील महिला व पुरुषांना स्वावलंबी करण्यासाठी कमी कालावधीचे कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिले.
चेंबूर येथील शासकीय पुरुष आणि महिला भिक्षेकरीगृह आणि मानखुर्द येथील दि चिल्ड्रेन्स अॅण्ड होम, मुले तसेच मुलींचे नवीन बालगृह, गतिमंद मुलांसाठीचे बालगृह, चिल्ड्रेन्स अॅण्ड सोसायटीची प्राथमिक व माध्यमिक शाळा याठिकाणी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी भेट देऊन तिथे देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधा, अन्न-धान्याची गुणवत्ता, स्वयंपाकाच्या ठिकाणी असणारी स्वच्छता तसेच बालकांच्या सुरक्षिततेबाबत पाहणी केली. दरम्यान तिथे तयार करण्यात आलेल्या जेवणाची चव चाखून गुणवत्ताही अदिती तटकरे यांनी तपासली.
मानखुर्दमधील नवीन तसेच अतिरिक्त बालगृह येथील मुलींनी कोळीनृत्याने मंत्री अदिती तटकरे यांचे स्वागत केले. यावेळी महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची पाहणीही अदिती तटकरे यांनी केली. बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये दिले जाणारे प्रशिक्षण याबाबत अदिती तटकरे यांनी यावेळी माहिती घेतली. बालके आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.